चैत्रांगण

गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला
इंद्रधनुचे तोरण शोभे तुझ्या गाभाऱ्याला
घाल रात्रीचे काजळ माळ वेणीत चांदणे
चंद्रकोरीची काकणे, दवबिंदूची पैंजणे
सोनसळी चा पदर, सांज रंगाची पैठणी
गर्भरेशमी आभाळ शेला, पांघर साजणी
सूर्यकिरणांनी रेख, भाळी कुंकवाची चिरी
गळा नक्षत्र मण्यांची, माळ खुलू दे साजरी
गोऱ्या तळव्याला लाव, चैत्रपालवी ची मेहंदी
कर आकाशगंगेला, तुझ्या भांगातली बिंदी
रूप लावण्य हे तुझे, जशी मदनाची रती
ओठावरी उगवती, गालांवरी मावळती
जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झुला
ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलवीती तुला
(कवयित्री : क्रांती )

वरील ओळीं वरून चैत्र महिना व चैत्र गौरीचे आगमन आपल्या लक्षात आले असेलच. आपले पारंपारिक सण व उत्सव हे निसर्ग चक्राशी बांधलेले आहेत. चैत्राचे स्वागत आपण “चैत्रांगण” काढून व त्याविषयी गप्पा मारून करूयात. चैत्रांगणाचा उगम हा लोकसंस्कृतीत आहे. विविध शुभचिन्हांनी नटलेली एक रांगोळी चैत्र महिन्यात काढली जाते. या रांगोळीत एकूण किती चिन्हे असावेत याचा काही निश्चित संकेत नाही. चैत्र गौरीचे स्वागत हा या रांगोळीचा महत्वाचा हेतू. पार्वती माहेरपणाला आली आहे, तिचे आपण स्वागत करत आहोत हे लक्षात घ्या. माहेरवाशिणी च्या स्वागतात काय नसते ? वात्सल्य, प्रेम आपुलकी यांनी ओतप्रोत भरलेले असते हे सगळे. तिचे स्वागत करणारे हे माहेरघर समृद्ध, संपन्न व कलासक्त असे आहे. देखण्या प्रवेशद्वारावरती लावलेले हिरवेकंच आंब्याचे तोरण हे आपल्याला तेच सांगते आहे. त्यानंतर येतात जगरहाटी चे प्रणेते असे सूर्य चंद्र तारे. मग येतात उत्सव मूर्ती. देवघरातील दोन बाहुल्या हे त्याचे प्रतीक. त्यांना तुम्ही शिवपार्वती लक्ष्मीनारायण किंवा गौरींची जोडी असे काहीही म्हणू शकता. उत्पत्ती, स्थिती आणि लय या अविरत चक्राची जाणीव देणारे ब्रम्हा विष्णू महेश एका बाजूला तर त्यांच्या अर्धांगिनी लक्ष्मी पार्वती सरस्वती दुसऱ्या बाजूला. या सर्वांची अस्त्रे शस्त्रे, त्यांना प्रिय असलेल्या वस्तू या लगेच दाखवल्या जातात. शंख, चक्र, गदा पद्म, बेल, तुळस दुर्वा इत्यादी. लक्ष्मीची पावले गोपद्म ही धनसंपदा व सुजन यांची प्रतीके आहेत. पंचतत्व म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश यांची प्रतीके देखील जागोजागी या रांगोळीत येतात. त्यानंतर देवीची आभूषणे दाखवतात. या सर्व देवांची वाहने देखील दाखवली जातात त्यामध्ये हत्ती घोडा नाग गरुड कासव यांचा समावेश होतो. हत्ती हे ऐश्वर्याचे, नाग हा बळीराजाचा मित्र म्हणून, गरुड सामर्थ्याचे प्रतीक तर कासव हे इंद्रिय निग्रहाचे प्रतीक आहे.त्रिमूर्ती सोबतच श्रीकृष्ण, गजानन, हनुमान व श्रीराम हेदेखील दाखवले जातात. श्रीकृष्ण आला की बासरी, मोरपीस व गाय वासरू हे आले. श्री शंकराचे प्रतीक म्हणून पिंड, त्रिदल बेल, नाग युग्म, डमरू, त्रिशूळ व धनुष्य दाखवण्याची प्रथा आहे या सर्व देवांचे स्वागत आपण मंगलध्वनीने करतो. त्यासाठी सनई चौघडा बासरी आणि भक्ती रसाचे प्रतीक असे टाळ येथे आहेत. येथे दिवाही दाखवला आहे ते लक्ष्मीचे प्रतीक आहे मोर हा पावसाचा दूत आहे सौंदर्य आणि वैभवाचं प्रतीक आहे तर मासा आपल्याला गतीची जाणीव करून देतो. माहेरवाशिणी ला इकडची काडी तिकडे करायला लागू नये याची खास काळजी घेतली जाते त्यासाठी तिला लागणाऱ्या सर्व बारीकसारीक वस्तू अगदी आरसा फणी मणी मंगळसूत्र, सौभाग्यवाण सकट सुसज्ज ठेवल्या जातात. निसर्गचक्रातील पशु पक्षी, प्राणी त्यांची मंजुळ किलबिल या सर्व गोष्टींशी म्हणजेच निसर्ग चक्राशी संतुलन साधण्याची एक उर्मी व जाणीव आपल्यात निर्माण करणे हाही या चिन्हा मागचा एक हेतू आहे.आत्म्या कडून परमात्म्याकडे, निसर्गतत्वा कडे गेले पाहिजे याची जाणीव कळत-नकळत मनुष्यमात्रात निर्माण करणे हा या चैत्रांगणाचा अंतस्थ हेतू आहे. ही रांगोळी ठिपके आणि हस्तरेषा यांच्या समन्वयाने काढली जाते.या रांगोळीत रंगांचा वापर केला जात नाही. पूर्वी गोमयाने सारवलेल्या किंवा गेरूने रंगवलेल्या जमिनीवर ही रांगोळी काढली जायची. आता कालानुरूप आपण ती फरशीवर काढतो.चैत्रांगण हे महाराष्ट्राच्या कला व परंपरेचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. ही परंपरा प्रवाहित ठेवण्यासाठी आपण जमेल तसे हे चैत्रांगण काढले पाहिजे.चैत्रगौरी पुढे आपण करंजी, चकली ,आंब्याची डाळ, पन्हे इत्यादी गोष्टींचा नैवेद्य दाखवतात. त्यात लाडू सुद्धा असतात. पण बुंदीचा लाडू, तोसुद्धा गुळाचा हे मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे ….पुढच्या भागाची ! पाककलेच्या ब्लॉगमध्ये ही रांगोळी कशाला? पाककलेत असलेला निसर्ग तत्वाचा अविभाज्य भाग अधोरेखित करण्यासाठी !

Chaitrangan: The Rangoli that is drawn with white stone powder in front of the altar (We call it देवघर, literally meaning the residence of God, a place where the idols of Gods are worshipped inside the house. The concept of देवघर doesn’t have a specific word in English, since that’s not part of the western culture.)
‘Chaitrangan’ is a compound word consisting of two different concepts, ‘Chaitra’ which is the first month of the Hindu calendar and ‘Angan’, meaning courtyard.
It is a holy month for Hindus all over the world. Maharashtrians, Kannadigas and Andhraites celebrate new year on the first day of Chaitra maas or the month of Chaitra. Spring is in full bloom during this month. So, festivities are interwoven with the colors of nature, thus to celebrate nature itself.
The motifs of the Chaitrangan Rangoli are those which indicate elements of nature and signs and symbols of Hinduism. It is gratitude towards nature and bhakti towards the Giver, that forms the basis of Chaitrangan.
Kindly watch the video to understand this in detail. Also follow the blog #खमंग for learning more about Maharashtrian food and culture.

English Translation: Courtesy Mrs Sharvari Kahatavkar

7 Comments Add yours

  1. Shriram Dandekar म्हणतो आहे:

    फारच सुंदर ….

    नवीन माहिती मिळाली

    शुभांगी – जय हो

    Liked by 1 person

  2. Hemant Suresh Vaidya म्हणतो आहे:

    विणा , फारच सुंदर लिहिलंय ग तू 👌👏☺️

    Liked by 1 person

  3. डाॅ. अ भा हरके म्हणतो आहे:

    अक्षय तृतियेच्या निमीत्ताने तयार केलेली ही चित्रफित उत्तम! लोकसंस्कृती जतन करण्याची ही धडपड अनाठायी निश्चीतच नाही. या निमीत्ताने काढलेली रांगोळीही (चैत्रांगण) उत्तम ! अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!!

    Liked by 1 person

    1. Pratibha म्हणतो आहे:

      खूप छान

      Liked by 1 person

  4. Janhavi Namjoshi म्हणतो आहे:

    अप्रतिम ताई. चैत्रांगण रांगोळी सुरेख, त्याविषयीचा तुझा लेख आणि त्यातील माहिती अतिशय महत्वपूर्ण. सर्वच खूप सुंदर तुझ्यासकट.
    प्रसन्नता, समाधान आणि आनंद ह्यांचा संगमच असतो तुझी प्रत्येक नवीन कलाकृती, पाककृती..

    धन्यवाद सौं जान्हवी.

    Liked by 1 person

  5. अन्वी म्हणतो आहे:

    सगळंच अगदी सुंदर ,सुरेख,रेखीव आणि कोरीव….अगदी तुझ्यासारख च….केवळ अप्रतिम!! तुझ्या प्रत्येक ब्लॉग मधून तुझे नवनवीन पैलू पाहायला मिळतात आणि नव्याने तू उमजू लागतेस…..

    Liked by 1 person

  6. शर्वरी अभ्यंकर म्हणतो आहे:

    सध्याच्या गतिमान जीवन शैली मुळे आपल्या सांस्कृतिक परंपरा अस्तंगत होत चालल्या आहेत.अशा परिस्थितीत अप्रतिम सौंदर्याने नटलेले चित्रांगण तू स्वत: रेखाटलेस आणि त्याबद्दल उचित माहिती दिलीस तर याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन

    Liked by 1 person

यावर आपले मत नोंदवा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.